Saturday, October 01, 2005

आळशी माणसं...

“आळशी माणसं खूप हुशार असतात”. माझ्या या वाक्यावरची आईची प्रतिक्रिया ठरलेली आहे. “बरं बाई. तुमचा रेडा गाभणा. देतो, चांगलं दहा शेर दूध देतो.” आळशीपणा आणि हुशारी यांचं समीकरण जरी आईला पटलेलं नसलं तरी माझा यावर ठाम विश्वास आहे. माझ्या अनेक (आळशी) आप्तेष्टांचा माझ्या या मताला सुप्त पाठिंबा आहे हे मला ठाऊक आहे.
आळशी माणसं कधीही cotton चे किंवा रंग जाणारे कपडे विकत घेत नाहीत. Synthetic, मळखाऊ रंगाचे, machine wash/ बाई wash असेच कपडे घेतात. Wrinkle free कापड हा त्यांचा आवडता प्रकार. १-१ कपडा वेगळा धुणार कोण आणि cotton च्या कपड्यांना इस्त्री करणार कोण? एवढा सगळा विचार कपडे घेताना करावा लागतो आणि त्यासाठी चाणाक्ष बुद्धी लागते. रात्री झोपायच्या आधी दिवा बंद करायला उठायचं नसेल तर जवळ switch घेण्याची व्यवस्था घराचं wiring चालू असतानाच करून घ्यावी लागते. इतक्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवून करणं हे काही येरागबाळ्याचं काम नव्हे. दसरा आला की २ दिवस आधी गाडीचं servicing करून आणतील. म्हणजे नंतर नुसता हार घातला की काम झालं.
ही माणसं जेवतात अगदी सावकाश. यांचं जेवण होईपर्यंत ताटं उचलून झालेली असतात, उरलं सुरलं काढून ठेवलेलं असतं. अगदी पुसून घ्यायची वेळ आली तर ताट हातात घेऊन जेवत बसतात. नंतर यांना काही काम पडत नाही. हे लोक बहुधा भात खात नाहीत. भाताआधीचं जेवण होईपर्यंत इतका चेंगटपणा करतात की भाताची आणि झोपेची वेळ एकच येते. बरं भात खाल्ला नाही म्हणजे जाडी वाढत नाही आणि जाडी वाढली नाही म्हणजे व्यायाम करावा लागत नाही. चहा गाळल्यावर चोथा हातानी कधीही काढत नाहीत, त्यात पाणी घालून परत गाळतात आणि तेच dust bin वर आपटतात. देवालाही सोडत नाहीत. पूजेला बसताना पंचपात्रात पाणी घ्यायला नको म्हणून सरळ देवाला नळाखाली धरतात. चेष्टा नाही – प्रत्यक्ष पाहिलं आहे.
हे लोक public मध्ये मात्र प्रिय असतात. कधीही फारशी कटकट करत नाहीत. महिनोंमहिने यांचं पासबुक अपडेटेड नसतं. ते असावं असा त्यांचा हट्टही नसतो. बँकेत गेले आणि printer बंद असला तर सरळ बाहेर येतात, वाट बघत किंवा हुज्जत घालत बसत नाहीत. भाजी घेताना कोणती भाजी केवढ्याला वगैरे विचारत बसत नाहीत. सगळं घेऊन झालं की एकदमच किती झाले ते विचारतात. जणू काही त्यानीच आपल्याला गणित शिकवलं आहे अशा थाटात मान डोलवत पैसे देऊन रिकामे होतात. तो सुट्टे नाही म्हणाला तर उरलेले पैसे त्याला दान करतात. आपलं पाकिट उलथं पालथं करून सुट्टे शोधायच्या किंवा शेजारच्या दुकानातून वगैरे सुट्टे करून घ्यायच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे भाजीवाले, रिक्षावाले इ. लोक यांच्यावर सदैव खूष असतात. अशा लोकांमुळेच तर रिक्षा, taxi चालू आहेत. अहो चितळे, वैद्य यांचा धंदा चाललाच नसता जर सगळ्या बायकांनी मोदक, पुरणपोळ्या घरीच करायचं ठरवलं असतं तर.
आळशी माणसं काम बाकी छान करून घेतात. उंटावरून शेळ्या हाकायची सवयच असते ना. आपलं काम समोरच्याकडून कसं करून घ्यावं हे त्यांना बरोब्बर कळतं. आळशीपणा हा एक गुण “manager” म्हणवून घेणार्या प्राण्याकडे असणं आवश्यक आहे असं मला मनापासून वाटतं. अति उत्साही manager प्रत्येक न् प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत बसतो. आपलं काम तर वाढवतोच पण हाताखालच्या लोकांना प्रचंड irritate करतो.
खरंतर माणूस आळशी आहे म्हणूनच तो उत्क्रांत झाला. दुनिया ज्यांची सारखी उदाहरणं देत असते, त्या मुंग्या, मधमाश्या किंवा कोळ्यांसारखं सारखं काम करत बसला असता, तर त्यांच्यासारखाच राहिला असता. माझ्यामते “गरज ही शोधाची जननी आहे” असं म्हणण्यापेक्षा “आळस ही शोधाची जननी आहे” असं म्हणलं पाहिजे. पायावर चालत राहिला असता तर वाहनं तयार झालीच नसती. सगळे निरोप प्रत्यक्ष जाऊन सांगायचे ठरवले असते तर post, telegram, e-mail या गोष्टी अस्तित्वात आल्याच नसत्या. Remote control, cordless phone यांची गरज किती होती हे बघा आणि त्यामागे आळस किती होता हे बघा. आणि आता तुम्हीच सांगा, आळशीपणा आणि हुशारी यांचं नातं आहे की नाही.

6 Comments:

Blogger Maitreyee said...

Hi Amruta,
Bara jhala tu pan lihayla laaglis.
Company madhe bore jhala ki vachayla kahi tari interesting asel. "Alshi Mansa" sahi aahe!!!

9:48 AM  
Blogger NiShabd said...

Apratim. :-)

NiShabd
NiShabd.blogspot.com

10:23 PM  
Blogger abhijit said...

he he he..agadi manatal lihilays..

aani dev naLakhali dharane mhanje afalatunach.

12:10 AM  
Blogger Ashutosh Shinde said...

Very Very good article

10:36 PM  
Blogger A said...

:) You should start writing again!

5:30 AM  
Blogger A said...

:) You should start writing again!

5:31 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home