Saturday, December 17, 2005

सात्विक संताप

‘चीड’ ही साधी सोपी भावना जेंव्हा सभ्य लोकांच्या मनात जन्म घेते, तेंव्हा तिला जे बाळसेदार नाव प्राप्त होतं, त्याला म्हणतात ‘सात्विक संताप’. क्षुल्लक कारणामुळे जर एखाद्या सभ्य व्यक्तीचा अगदी चडफडाट झाला तर त्याला म्हणतात ‘सात्विक संताप’. लक्षात घ्या, एखादा राग ‘सात्विक संताप’ म्हणून qualify होण्यासाठी उपरोक्त ३ गोष्टी आवश्यक आहेत – कारण अगदी क्षुल्लक असलं पाहिजे, कर्त्याचा पार तिळपापड झाला पाहिजे आणि कर्ता हा अत्यंत सभ्य किंबहुना सात्विक असला पाहिजे.

सात्विक संताप येण्याचं कारण म्हणजे ‘नियमभंग’. सत्वगुणी व्यक्तीच्या तत्वांशी, मूल्यांशी खेळ झाला तर त्यांना जे काही होतं तो सात्विक संताप. आता मुळात सात्विक माणूसच तात्विक असू शकतो. सत्वगुणातून जन्मलेल्या तत्वांची पायमल्ली होऊन त्याचं रूपांतर जेंव्हा तमोगुणात होतं, तेंव्हा त्याला म्हणतात ‘सात्विक संताप’. बरं झाली तत्वांची मोडतोड, मग लढा ना त्याविरुद्ध, चिडून काय होणार आहे? पण ते होणे नाही... कारण, ९०% वेळा हा मनुष्य मध्यमवर्गीय असतो. चिडण्याव्यतिरिक्त अन्य काही करणं त्याला शक्य नसतं. पापभीरू वृत्तीचा, आपली व आपल्या कुटुंबाची खुशाली चिंतणारा मनुष्य कुणाचंही काहीही वाकडं करूच शकत नाही.

हा झाला सात्विक भाग. दुसरा मुद्दा आहे, कारण क्षुल्लक असण्याचा. ही काही उदाहरणं पाहूया...

‘अ’ आज चांगलाच आनंदात आहे. रविवार सकाळची ९ वाजताची वेळ आहे. नाटकाची तिकिटं काढायला निघाला आहे. काsssही घाई नाहीये. पहिल्याच चौकात signal चा दिवा लाल झाला आहे. ८० चा आकडा पाहून ‘अ’ इमाने इतबारे गाडी बंद करून थांबला आहे. ७८, ७६, ७५.....हा कर्कश्श आवाज कसला? ओह.... truck आहे. ‘अ’ हसत हसत लाल दिव्याकडे बोट दाखवतो आहे, अपेक्षा आहे की driver साहेब म्हणतील, “ओह मी पाहिलंच नाही, sorry हं”, आणि truck बंद करून थांबतील. पण उत्तर आलं “तुम्हाला थांबायचं तर थांबा की, आमची खोटी कशापायी करताय सकाळी सकाळी”. एक इरसाल शिवी आठवण्याचा प्रयत्न करीत ‘अ’ने गाडी बाजूला घेतली आहे... रस्त्यापलीकडच्या दुकानातला नोकर झाडू मारता मारता हसतो आहे. आत्ता ‘अ’चं जे काही झालं आहे, तो आहे सात्विक संताप.

‘ब’चं मराठीवर, शुद्ध मराठीवर आत्यंतिक प्रेम आहे. शेजारीच एक नवीन दुकान सुरु झालं आहे. काही पुस्तकं घ्यावीत आणि दुकानातलं collection कसं आहे हे पाहावं म्हणून ‘ब’चा मोर्चा दुकानाकडे वळला आहे. हे काय, दुकान बंद.... आणि पाटी काय लावली आहे म्हणे....
“सुचणा”
“ ऊदया दीणांक साहा डीसेंबर रोजि दुकाण बंद राहिल... क्शमस्व.... “
अशी ‘सुद्द’ मराठीतली पाटी वाचून ‘ब’ला जे काही झालं आहे, तो आहे सात्विक संताप.

‘क’ हा अतिशय कलाप्रिय आणि शिस्तप्रिय माणूस. शाळा कॉलेजात याने अनेक कार्यक्रम यशस्वीपणे बसवले आहेत. २ वर्ष नुसती खर्डेघाशी केल्यानंतर जुन्या मित्रांना जमवून १ कार्यक्रम बसवायचं ठरलं आहे. ठरल्याप्रमाणे भल्या पहाटे उठून रविवारी सकाळी ८ वाजता हा ठरल्या ठिकाणी हजर आहे... पण अजून कोणाचाच पत्ता नाही. ८-१५, ८-३०, ८-४५..... शेवटी ९ वाजता सगळे आले आहेत, पण सगळ्यांना भूक लागली असल्याने break fast साठी वैशाली कडे मोर्चा वळला आहे. यांना कशाचा seriousness कसा नाही असा विचार करत ‘क’ सात्विक संतापाचा धनी झाला आहे.
एकूण तुमच्या लक्षात आलं असेल की या सगळ्यांच्या अपेक्षा काही revolutionary नाहीत, साध्या आहेत. वेळ पाळली पाहिजे, शुद्ध लिहिलं/बोललं पाहिजे, traffic चे नियम पाळले पाहिजेत इ. इ. तसं पाहिलं तर यांचे मुद्दे बरोबर आहेत, पण ते नाही पाळले गेले तर स्वतःला इतका त्रास करून घ्यायची काही गरजही नाहीये. तरीही यांना राग येतो आहे, नव्हे नव्हे सात्विक संताप येतो आहे.

धोक्याची सूचना – तुमच्या आसपासच्या कोणास जर सात्विक संताप आला असेल, तर कृपया त्यावर हसू नका. चेष्टा तर अजिबात करू नका, अन्यथा एक प्रवचन ऐकावे लागेल.

Friday, December 02, 2005

पुनरुक्ती

“अगं आई, परवा केतकी भेटली होती....” ... माझं वाक्य मध्येच तोडत आईने बोटांनी ४ आकडा दाखवला. आणि म्हणाली “चौथ्यांदा सांगते आहेस”. मी जराशी हिरमुसले. काय बिघडलं असतं आणखी एकदा ऐकलं असतं तर? पण ही बोटांनी खूण करण्यची प्रथा मीच पाडली असल्याने गप्प बसले. पण मी सांगत होते कारण मला खूप सांगावसं वाटत होतं म्हणून. केतकी अचानक भेटल्यामुळे मला इतका आनंद झाला होता की गेले ३ दिवस मी आमच्या शाळेतल्या आठवणींमधून बाहेर येऊच शकले नव्हते. आणि तो आनंद मला वारंवार व्यक्त करायचा होता.

असं काय बघताय? मी काही एकटी नाही जगात जी तीच तीच गोष्ट परत परत सांगते. खूप जणांना ही सवय असते. वेगवेगळ्या कारणांनी लोक गोष्टी परत परत सांगत राहतात. अनेकदा या पुनरुक्तीची सुरुवात “मी सांगितलं का गं तुला?” किंवा “तुला सांगायचंच राहिलं बघ” या नांदीने होते. यापुढे बहुधा काहीतरी बातमी असते. “अमुकला तमक्या college मध्ये admission मिळाली”, “तमुकनी job change केला”, “ढमक्याचं लग्नं ठरलं” वगैरे वगैरे. यापुढे काही वेळ अमुक, तमुक किंवा ढमुक या विषयावर चर्चा अपेक्षित असते. श्रोता पहिल्यांदा ऐकताना “अरे वा”, “आयला!”, “हो का?” अशा reactions देतो. रंगतदार चर्चाही होते. परत तीच बातमी जेंव्हा सांगण्यात येते, तेंव्हा फक्त “हं” येतो. पुढच्या वेळी “हो सांगितलंस तू मला” अशी warning दिली जाते. यानंतर मात्र “किती वेळा सांगशील तेच तेच” अशी बोळवण होते.

या प्रकाराचं १ अतिशय irritating रूप म्हणजे “सूचना”. आपण कुठे trek ला, किंवा interview ला जाणार असलो, की प्रत्येक सूचना हजार वेळा ऐकावी लागते. “धांदरटपणा करू नकोस”, “फार पुढे जाऊ नका” इ. इ. चा भडिमार चालू असतो. बर चुकून काही चुकलंच तर “हजार वेळा सांगून झालं, पण ऐकतंय कोण?” हेही ऐकावं लागतं. कधी आपल्याला एखादं काम सांगितलं जातं. ते आपण विसरणार याची खात्रीच असते घरच्यांना. मग “नाही, विसरशील परत... ” असं म्हणत अनेकदा त्याची आठवण करून दिली जाते. यामध्ये बहुधा जाता-येता एखादं बिल भरणे, कोणाचं काही सामान कुठेतरी पोचवणे किंवा आणणे, कपडे इस्त्रीला देणे आदि गोष्टी येतात. हे एका limit च्या पुढे गेलं, की आपण खरोखरच ते काम करणं विसरून जातो.

वयस्कर व्यक्तींना आपल्या भूतकाळात रमत, आठवणींमध्ये कोरलेले प्रसंग सांगायची खूप सवय असते. याबाबतीत मला चिपळूकर सरांची आठवण येते. कधीही त्यांना भेटायला गेलं, की त्यांच्या तरूणपणातला हा किस्सा ऐकावाच लागतो. “काय सांगू तुला, मी आमच्या Fergusson च्या कबड्डी team चा कॅप्टन होतो. आम्ही एक tournament जिंकली होती. एवढा विजेत्या team चा कॅप्टन होतो, पण आमच्या college मधली एक मुलगी माझं अभिनंदन करायला आली तेंव्हा जाम घाबरलो होतो. तिनं नुसतं अभिनंदन नाही केलं, तर shakehand करायला हात पुढे केला. माझा हात काय थरथरत होता म्हणून सांगू..... नाहीतर ही आजकालची पोरं.... गळ्यात गळे काय घालतात, पापे काय घेतात...” यानंतर मग class मधल्या एखाद्या मुलानी कसं प्रेमप्रकरण केलं, अभ्यासाकडे कसं दुर्लक्ष केलं आणि मग सरांनी त्याला कसं वठणीवर आणलं, याची कथा असते.

अर्थात काहीसा हा प्रकार आपणही करतो. Engineering च्या submission ला घातलेले घोळ, मारलेल्या nights, केलेल्या copies हा विषय अनेकदा निघतो. आपण किती इरसाल आहोत हे समोरच्याला पटवून देत आपण तेच किस्से घोळवत राहतो. पुरुषोत्तम, फिरोदिया करणारी मंडळी तालमीच्या वेळच्या आठवणी आळवत राहतात. तो आनंद काही आगळाच असतो.....
एकूण माझ्या लक्षात येतंय की माझा मुद्दा मांडता मांडता मी ही तेच तेच परत परत सांगते आहे. तेंव्हा आता आवरतं घ्यावं हे बरं.